Saturday, June 13, 2020

सीतेचा भूमिप्रवेश


मुशाफिरी कलाविश्वातली

सीतेचा भूमिप्रवेश

रामायणातल्या सीतेच्या जन्माविषयी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कथा वाचायला मिळतात. यातली वाल्मिकींनी रचलेल्या रामायणामध्ये लिहिलेली सीतेच्या जन्माची कथा सर्वात जास्त ग्राह्य मानली जाते. वाल्मिकी रामायणाप्रमाणे सीता विदेह देशात जमिनीची नांगरणी चालू असताना सापडली. खरंतर 'सीता' या शब्दाचा अर्थ होतो नांगरणी चालू असताना जमिनीवर तयार होणारा खोलगट भाग (चर).  यामुळं सीतेची माता ही धरणी असल्याचं मानण्यात येतं. या काळात विदेह देशाचा राजा जनक यानं सीतेचा सांभाळ केला. त्यामुळे सीताजानकी’ या नावानंही ओळखली जाते. तर विदेह देशाची राजकन्या असल्यानं तीवैदेही’ अशा नावानंही ओळखली जाते. मिथिला नगरात राहत असल्यानं तिलामैथिली’ असंही नाव पडलं.

यानंतरचं सीता स्वयंवर, रावणानं केलेलं सीतेचं हरण, राम-रावण युद्ध हे सारं रामायण आपण जाणतोच. कितीही पवित्र असली तरी सीतेला यानंतर रावणाकडून परत येताना अग्निपरीक्षा द्यावी लागली. आणि नंतर अयोध्येतल्या प्रजेच्या  मानसिकतेमुळं रामाला सीतेचा त्याग करावा लागला. गर्भवती असणाऱ्या सीतेनं अरण्यामध्ये जाऊन आश्रमामध्ये लव आणि कुश यांना जन्म दिला. पुढं रामानं केलेल्या अश्वमेध यज्ञाचा घोडा या लव कुश यांनी अडवला. सीतेच्या बाजूनं धर्म असल्यानं या बालकांचा विजय झाला तर अयोध्येच्या सैन्याचा पराभव झाला असं मानण्यात येतं.

आपली सीता पवित्र आहे हे रामाला पूर्वीपासूनच माहीत होतं. सीतेनं आपल्यासोबत राहायला परत यावं असं रामाला वाटत होतं. पण अयोध्येच्या प्रजेच्या मानसिकतेचा विचार करत त्यानं सीतेला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा द्यायला सांगितलं. यावेळी मात्र सीतेनं अग्निपरीक्षा देण्याऐवजी वेगळा निर्णय घेतला. जर आपण पवित्र आणि शुद्ध असू तर आपण जिथून आलो (म्हणजे धरणी मधून) त्या ठिकाणी परत जाण्याची घोषणा तिनं केली. आणि त्याच क्षणी धरणी मातेनं सीतेला आपल्या पोटात घेतलं.

सीता धरणीच्या पोटात जाताना सारे लोक थक्क झाले. दुखी आणि असहाय राम तिला जाताना पाहून काहीच करू शकला नाही. ज्या अयोध्येच्या जनतेनं सीतेला एके काळी त्यागलेलं होतं त्याच जनतेचा आता सीतेनं त्याग केला.


राजा रवी वर्मा यांनी भारतातल्या पुराणांमधले बरेचशे प्रसंग मोठ्या कल्पकतेनं कॅनव्हासवर आणले. ही चित्रे छापली गेली आणि ती भारतातल्या घराघरांत पोहोचली. आपल्याला सोबत दिसतंय ते सीतेच्या भूमिप्रवेशाचं चित्र राजा रविवर्मा यांनीच काढलंय. चित्रात आपल्याला सीतेला धरणीमातेनं पकडलेलं दिसतंय. सीता जमिनीत जायला सुरुवात झालेली आहे. राम आणि सीता एकमेकांकडं पाहत आहेत. झालेल्या घटनेकडं ऋषी आश्चर्यानं पाहत आहेत. लव कुश शोकाकुल झालेले दिसताहेत तर लक्ष्मण प्रश्नात पडलेला दिसतोय. पार्श्वभूमीला भव्य प्रासाद, भगव्या रंगाचे ध्वज आणि अंधार दिसतोय.

चित्रात दिसणारे दोन ऋषी वसिष्ठ, वाल्मिकी असावेत असं मानलं जातं. जेव्हा राजा सिंहासनावर बसतो तेव्हा धनुष्य किंवा तत्सम शस्त्र बाळगत नाही फक्त खड्ग धारण करतो. ते देखिल आत्म रक्षणासाठी. त्यामुळं रामाजवळ आपल्याला तलवार दिसत आहे. देवी सीत भूमीगत होण्याचा प्रसंग वाल्मिकी रामायणानुसार राजदरबारात घडला आहे. 

रामानं परिधान केलेलं वस्त्र अंगरखा नाही, तर पितांबर व उत्तरीय आहे. तसेच उत्तरिया खाली चिलखत सदृश छातीसाठी संरक्षण आहे. त्याचा रत्नजडित भाग खांद्यावर गोलाकार दिसतो.

राजा रविवर्मा  चित्रामध्ये राम आणि सीता यांच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त प्रकाश दाखवला आहे. पार्श्वभूमीला असणाऱ्या अंधारामुळं आपलं लक्ष आपोआपच राम आणि सीता यांच्याकडं खेचलं जातं. पार्श्वभूमीला असणारा अंधार आणि राम, सीता यांच्यावर असणारा प्रकाश यामुळं चित्राच्या रचनेत एक प्रकारे समतोल साधला जातो. रामाचा चेहरा चित्राच्या उजवीकडच्या आणि वरच्या भागात आहे तर सीतेचा डावीकडच्या आणि खालच्या भागात आहे. यातही आपल्याला समतोल दिसून येतो. पार्श्वभूमीला असणाऱ्या भव्य प्रसादाच्या उभ्या रेषांमुळे, सोनेरी शिखरांमुळे आणि चित्रातल्या पुढच्या भागातल्या सिंहासन, मुकुट, दागिने यांच्या सोनेरी रंगामुळं आपल्याला अयोध्येच्या ऐश्वर्याची जाणीव होते.

गुजरातमधल्या बडोदा इथल्या महाराज फतेह सिंग कलासंग्रहालयात सध्या हे चित्र आहे. या चित्राची नक्की तारीख आज ज्ञात नाही, पण हे चित्र एकोणिसाव्या शतकात काढलं गेलं असल्याचं मानण्यात येतं.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

🌺 संदर्भ :
Image Credit:
Raja Ravi Varma / Public domain

No comments:

Post a Comment