Saturday, January 25, 2020

विनय, बादल आणि दिनेश


मुशाफिरी कलाविश्वातली

विनय, बादल आणि दिनेश

१९३० च्या ऑगस्ट मधली गोष्ट. बंगालमधल्या (ढाका) एका मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात एक ज्येष्ठ इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला आणले होते. त्याच्यावर उपचार चालू होते. त्याला पाहण्यासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असणारा लोमन येणार होता.

ठरल्याप्रमाणं लोमन इस्पितळात आला. ज्या वैद्यकीय महाविद्यालयाचं हे इस्पितळ होतं त्या महाविद्यालयात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी त्याच वेळी इस्पितळात आला. त्यानं पारंपरिक बंगाली वेष परिधान केला होता. त्यानं सारी सुरक्षा व्यवस्था भेदली आणि लोमनवर जवळून गोळ्या झाडल्या !! लोमन तात्काळ मृत्यू पावला. त्याच्यासोबत असणारा हॉडसन नावाचा पोलीस अधिकारीही गंभीररीत्या जखमी झाला.

तो कोण होता हे गुपित नव्हतं. महाविद्यालयाच्याच एका मॅगझीनमधून त्याचं छायाचित्र घेऊन ते सर्वत्र चिकटवण्यात आलं. त्याला पकडण्यासाठी १०००० रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलं.

या मुलाचं नाव होतं विनय बसु. त्यानं बंगाल व्हॉलन्टीअर्स नावाच्या एक क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ही संघटना १९२८ मध्ये स्थापन केली होती. विनयनं या संघटनेची ढाका इथं एक प्रकारे शाखा सुरु केली होती. त्या काळात काही इंग्रज पोलीस अधिकारी अटक केलेल्या भारतीय राजकीय बंदीवानांचा तुरुंगात छळ करत. अशा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध काम करण्याची या संघटनेची योजना होती. या योजनेचा एक भाग म्हणूनच विनयनं लोमनची हत्या केली होती. 

पोलिसांचा पाठलाग चुकवत विनय कलकत्याला आला. तिथं क्रांतिकारी लोकांनी त्याच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

या काळात कर्नल एन एस सिम्प्सन हा इंग्रज अधिकारी इंस्पेक्टर जनरल आॅफ प्रिझन्स' या पदावर होता. भारतीय राजकीय कैद्यांचा अमानुष छळ करून त्यांचा आवाज बंद करता येईल असं त्याला वाटायचं. असा अमानुष छळ करण्यासाठी तो त्या काळात कुप्रसिध्द होता. स्वाभाविकच  क्रांतिकारक मंडळींमध्ये या सिम्प्सनविषयी कमालीची चीड होती. बंगाल व्हाॅलिंटियर्सचं पुढचं लक्ष्य होतं हा सिम्प्सन.

खरंतर फक्त सिम्प्सनला संपवून प्रश्न संपणार नव्हता, कारण मग इंग्रज अधिकारी लोकांत अजून एखादा सिम्प्सन तयार झाला असता. इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये एक भितीचा संदेश पाठवणं गरजेचं होतं. या क्रांतिकारक मंडळींनी असाच एक बेत आखला. इंग्रज लोकांच्या एका प्रमुख कार्यालयात जाऊन या सिम्प्सनला मारून हे साध्य होणार होते. क्रांतिकारक मंडळींनी नेमकं असंच ठरवलं. कलकत्त्यातला डलहौसी चौकातल्या रायटर्स बिल्डिंग (त्या वेळचं त्यांचं सचिवालय) इथं जाऊन सिम्प्सनला मारायचं ठरलं.

८ डिसेंबर १९३० रोजी विनय बसु, बादल गुप्ता आणि दिनेश गुप्ता या तीन क्रांतिकारकांनी युरोपियन वेष परिधान करत रायटर्स बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. या वेळी तिघांपैकी दोघांचं वय होतं २२, तर एकाचं वय होतं अवघं १८. या तिघांनी सरळ या सिम्प्सनवर गोळ्या झाडल्या आणि भारतीय कैद्यांचा अमानुष छळ करणारा सिंप्सन तिथंच संपला. अर्थातच इंग्रजांचं एक प्रमुख कार्यालय असल्यानं तिथं बरेचशे सुरक्षारक्षक होते. तीन क्रांतिकारक आणि हे सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. काही इंग्रज अधिकारी जखमी झाले.

तीन क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हाती लागायचं नव्हतं. यापैकी दोघांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या तर एकानं पोटॅशिअम सायनाईड हे विष खाऊन स्वतःला संपवलं.  तिघंही हुतात्मा झाले. सिम्प्सनची हत्या हे बंगाल व्हाॅलिंटियर्सनं पार पाडलेली एक प्रमुख कामगिरी मानण्यात येते.


डलहौसी चौकाचं नाव 'बीबीडी बाग' असं बदलण्यात आलं. बिनाॅय (विनय), बादल आणि दिनेश यांच्या नावांवरून चौकाचं नविन नाव ठेवलं गेलं. रायटर्स बिल्डिंगसमोर या तिघांचे पुतळे उभे करण्यात आले. सोबतच्या चित्रात आपल्याला हेच बोलके पुतळे दिसताहेत. तिघांनीही पाश्चात्त्य वेश परिधान केलेला दिसतोय. पुतळ्यांमध्ये एक प्रकारची गतिमानता, जिवंतपणा जाणवतो. तिघांच्याही हातात पिस्तूल दिसतात.

या तिघांचे हे जिवंत भासणारे पुतळे पाहताना देशभक्तीची भावना  जाणवल्यावाचून राहत नाही.

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

◆◆संदर्भ :

◆https://www.thebetterindia.com/154654/benoy-badal-dinesh-writers-building-kolkata-news/
★https://www.patrika.com/miscellenous-india/history-of-binoy-badal-dinesh-1-2219359/
★https://en.wikipedia.org/wiki/Bengal_Volunteers
★https://en.wikipedia.org/wiki/Benoy_Basu

◆◆Image Credit:

★https://commons.wikimedia.org/wiki/File:Statue_of_Benoy,_Badal_%26_Dinesh_in_front_of_Writers%27_Building,_Kolkata.jpg
Sujay25 [CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]

Saturday, January 11, 2020

वेरूळ लेण्यातलं एक रेखाटन


मुशाफिरी कलाविश्वातली


वेरूळ लेण्यातलं एक रेखाटन

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना इंग्रजांच्या काळात १८६१ मध्ये झाली होती. ब्राह्मी लिपीचं ज्ञान असणाऱ्या अलेक्झांडर कनिंगहॅम यानं या संस्थेची स्थापना केली होती. भारतातल्या बौद्ध धर्माशी निगडित असणाऱ्या वास्तूंचं त्यानं जवळपास ५० वर्षे सर्वेक्षण केलं. पुरातत्व संशोधनाचं वेड असणाऱ्या अलेक्झांडरनं सुरुवातीच्या काळातलं सारं काम स्वखर्चानंच केलं. कालांतरानं त्याच्या प्रयत्नातून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या संस्थेची स्थापना झाली.

संस्थेच्या सर्वोच्चपदी अलेक्झांडरनंतर जेम्स बुर्गेस आला. जेम्सलाही पुरातत्व संशोधनाचं असंच वेड होतं. भारतामध्ये त्यानं पुरातत्व संशोधनाचं काम करून कित्येक पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं बरीच लोकप्रिय झाली आणि त्यांच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या. यातली बहुसंख्य पुस्तकं आजही संदर्भासाठी वापरली जातात.

पुरातन काळातली मंदिरं, लेणी यांचा अभ्यास करताना जेम्स बऱ्याचदा रेखाटनं करायचा. वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करताना त्यानं सोबत दिलेलं रेखाटन केलं. वेरूळच्या पंधरा क्रमांकाच्या गुंफेमधलं (दशावतार लेणे) कोरीव कामाचं हे रेखाटन आहे. मार्कंडेय पुराणाशी संबंधित असणाऱ्या मार्कंडेय ऋषींच्या जीवनातला एक प्रसंग यात दाखवलाय.



शैव पंथीय लोकांच्या श्रद्धेप्रमाणं या मार्कंडेय ऋषींच्या जन्माची एक कथा आहे. एका ऋषीला मूल होत नव्हते. त्यानं शंकराची आराधना केली. शंकरानं प्रसन्न होऊन त्या ऋषीला पर्याय दिले. एकतर त्याला दिर्घायुष्यी पण मतिमंद अपत्य मिळू शकणार होते किंवा त्याला बुद्धिमान पण अल्पायुष्यी अपत्य मिळू शकणार होते. त्या ऋषीनं दुसरा पर्याय निवडला. त्याला बुद्धिमान असणारं मूल झालं. हे मूल मार्कंडेय नावानं ओळखलं जाऊ लागलं.

मार्कंडेय १६ वर्षांचा झाला तेंव्हा त्याचा मृत्यू जवळ आल्याचं त्याच्या आई वडिलांना समजलं. पण बुद्धिमान असल्यानं हा मुलगा मृत्यूला घाबरला नाही. मृत्यू प्रत्येकालाच अटळ आहे हे त्याला चांगलं माहीत होतं. मृत्यूला सामोरं जाण्यापूर्वी मार्कंडेयचा शिवाची आराधना करण्याचा मानस होता. नदीकाठची वाळू घेऊन त्यानं एक शिवलिंग बनवलं. आणि त्यानं शिवाची आराधना सुरु केली. त्याची आराधना सुरु असताना त्याच्या समोर यम येऊन उभा राहिला. मार्कंडेयानं त्याला प्रार्थना संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली. यमानं त्याची टिंगल करत त्याला सांगितलं की मृत्यू कुणासाठी थांबत नसतो. मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी यमानं मार्कंडेयाच्या नाकाला पकडलं. मार्कंडेयानं शिवाकडं मदतीची याचना केली. शिवानं यमाला परतावून लावलं आणि त्याच्या भक्ताची सुटका केली. यानंतर मार्कंडेय अमर झाला. शंकराचं नाव यानंतर यमान्तक असं पडलं.

जितकं सुंदर या लेण्यामधलं कोरीव काम आहे तितकंच सुंदर हे रेखाटन केल्याचं आपल्याला जाणवल्यावाचून राहत नाही !!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

The Indian biographical dictionary by Rao, C. Hayavando
Image Credit:
Burgess, James (1832-1916) [Public domain]

Friday, January 3, 2020

१७९० मधला पुण्यातला करार


मुशाफिरी कलाविश्वातली

१७९० मधला पुण्यातला करार 

१७८० च्या दशकातली गोष्ट. इंग्रजांना पुण्यामध्ये पेशव्यांच्या दरबारात आपला दूत कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासू लागली. आजपर्यंत इंग्रजांच्या दूतांनी इथं भेटी दिल्या असल्या तरी त्यातलं कुणी कायमस्वरूपी पुण्यात राहिलं नव्हतं. इंग्रजांनी या कामगिरीसाठी चार्ल्स मॅले नावाचा मुत्सद्दी निवडला. दरबारात कायमस्वरूपी दूत ठेवण्यासंबंधी बरेच विवाद झाल्यानंतर मार्च १७८६ रोजी मॅले पुण्यात आला.

मॅलेसोबत त्याच्या माणसांचा बराच लवाजमा होता. सहा इंग्रज अधिकारी, ३५ घोडे, २०० रक्षक, बाकीची बरीच माणसे, हत्ती, मेणे ह्या साऱ्यांचा त्यात समावेश होतापेशव्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचं गणेशखिंड इथं स्वागत केलं. मॅलेची राहण्याची व्यवस्था गायकवाड महालात करण्यात आली तर बाकीचा लवाजमा पर्वतीपाशी तंबू ठोकून राहिला. मॅलेनं पेशव्यांना देण्यासाठी खूप साऱ्या भेटवस्तू आणल्या होत्या. यात ऍबीसीनिया इथून आणलेला चार फूट उंच असणारा पक्षी (एक प्रकारचा शहामृग) होता. पण दुर्दैवानं तो पक्षी मरण पावला होता. काही कारणानं सुरुवातीला मॅलेला पेशव्यांना भेटता आलं नाही.

मॅलेनं लवकरच पुण्यात आपला जम बसवला. पुण्यात त्याला (आणि त्याच्या नोकरचाकरांना) राहण्यासाठी बंगला बांधण्यासाठी त्यानं पेशव्यांकडं जमीन मागितली. पेशव्यांकडून त्याला मुळा आणि मुठा नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणची जमीन मिळाली. त्यानं या ठिकाणी सुंदर घर बांधलं. घराभोवती छानसा बगिचाही केला. घराचं नाव 'संगम' असंच ठेवण्यात आलं. यात तऱ्हेतऱ्हेची फळांची झाडं आणि भाज्या लावण्यात आल्या. बाजूच्या नद्यांचंच पाणी या बगिच्यात वापरण्यात यायचं.  

मॅलेनं अगदी साध्या कारकूनांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. टेलिस्कोप, पृथ्वीच्या घनगोल प्रतिकृती, वैज्ञानिक उपकरणे तो पेशव्यांना भेट द्यायचा. पेशव्यांना ह्या भेटी आवडायच्या. स्थानिक लोकांच्या रितीरिवाजांची त्याला चांगली जाण होती. गणपतीच्या उत्सवात तो आवर्जून पेशव्यांकडं हजर असायचा. अधिकाऱ्यांच्या घराची लग्ने असोत वा मुंजी - तो कधी चुकवायचा नाही. पुण्यात खूप साऱ्या लोकांना तो परिचित होता.

अर्थातच हे सारं करताना इंग्रज लोकांची राजकीय आणि व्यापारी उद्दिष्टां साध्य करण्याचा त्यानं सर्वात आधी विचार केला. युरोपियन लोकांची कला, विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र त्यानं पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध इंग्रज चित्रकार जेम्स वेल्स याला त्यानं पुण्यात १७९० मध्ये आणलं (आणि हा चित्रकार मरेपर्यंत म्हणजे १७९५ पर्यंत पुण्यातच राहिला.) या चित्रकारानं पेशव्यांच्या दरबारातील बऱ्याच जणांची व्यक्तिचित्रं काढलीत. वेल्सच्या हाताखाली पुण्यात बरेचशे चित्रकारही तयार झाले !!

मॅलेनं ईस्ट इंडियाचा दूत म्हणून काम करताना उत्कृष्टपणे मुत्सद्देगिरी दाखवली. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जून १७९० रोजी त्यानं घडवून आणलेला करार. त्या काळात इंग्रजांना टिपू सुलतानचा मोठाच धोका होता. टिपूच्या वाढत्या सामर्थ्याला आळा घालणं खूपच आवश्यक होतं. मॅलेनं मराठे, निजाम आणि इंग्रज यांच्यात एक करार घडवून आणला. या कराराप्रमाणं तिघांचं सैन्य (मराठे, निजाम आणि इंग्रज) टिपूविरुद्ध एकत्रित लढणार होते. ह्या करारावर पेशव्यांनी गणपती रंगमहालात (म्हणजे शनिवारवाड्यात) जून १७९० रोजी स्वाक्षरी केली. एका दृष्टीनं इंग्रजांच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश होतं. पुढं या तिघांच्या एकत्रित सैन्यानं टिपूचा पराभव केला.

नंतर १७९७ मध्ये मॅले इंग्लंडमध्ये परतला. त्यानं घडवून आणलेल्या कराराचं त्याला एक चित्र बनवून घ्यायचं होतं. खरंतर त्याला हे चित्र त्यानं पुण्यात नेलेल्या जेम्स वेल्सकडून काढून घ्यायचं होतं पण वेल्स तर आता मरण पावला होता. याच काळात (१७८६ पासून ते १७९३ पर्यंत ) थॉमस डॅनियल नावाच्या दुसऱ्या एका इंग्रज चित्रकाराचे भारतात वास्तव्य होते. भारतामधली दृश्ये दाखवणारी चित्रं काढणं हा त्याचा हातखंडा होता. मॅलेनं हे चित्र काढण्याचं काम डॅनियलला दिलं. डॅनिएलनं आपलं सारं कौशल्य पणाला लावत या चित्राला न्याय दिला. त्यानं हे चित्र १८०५ मध्ये काढलं.


या चित्रात आपल्याला पेशव्यांच्या हातात कराराची कागदपत्रं दिसतात. ही कागदपत्रं स्वतमॅले पेशव्यांना देतोय. हे दृश्य गणपती रंगमहाल म्हणजे शनिवारवाड्यातलं आहे. मॅलेच्या मागं अजून काही इंग्रज दिसतात. दरबारात अनेक लोक दिसतात. मागच्या भिंतीवर गणपतीची मूर्तीही दिसते. तिथंच बाजूला एक विष्णूची मूर्ती दिसते. तैलरंगात काढलेलं हे चित्र सध्या इंग्लंडमधल्या टेट गॅलरीमध्ये आहे.
   
- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :

🍁‘Poona – the bygone days’ by Rao Bahadur D. B. Parasnis (published by The Times Press 1921)
🍁https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell

🌸Image credit:
https://commons.wikimedia.org/wiki/File:Thomas_Daniell,_Sir_Charles_Warre_Malet,_Concluding_a_Treaty_in_1790_in_Durbar_with_the_Peshwa_of_the_Maratha_Empire.jpg
Thomas Daniell [Public domain]