Friday, March 27, 2020

ग्यारह मूर्ती


मुशाफिरी कलाविश्वातली

ग्यारह मूर्ती

काही शिल्पं इतिहासातली एखादी घटना अक्षरश: जिवंत करतात. आपण पूर्वी फ्रेंच शिल्पकार रोदँचं एक शिल्प (https://dushyantwrites.blogspot.com/2018/07/blog-post_12.html) पाहिलं. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या युद्धातली चौदाव्या शतकातली एक घटना रोदँनं यात दाखवलीये. या शिल्पात आपल्याला लोकांची एक प्रकारची हालचाल, गतिमानता जाणवते. आणि त्यांची गतिमानता, देहबोली, हावभाव या साऱ्यांमुळंच हे शिल्प जिवंत बनून विश्वविख्यात झालं.

भारतीय शिल्पकार पद्मभूषण देवीप्रसाद रॉय चौधरी यांच्यावर रोदँचा प्रभाव होता. (देवीप्रसाद रॉय चौधरी 'ललित कला अकादेमी' चे founder chairman होते) त्यांचं एक शिल्प असंच इतिहासातला एक प्रसंग जिवंत करणारं आहे. या शिल्पातल्या लोकांच्या भासणाऱ्या हालचालींमुळं, त्यांच्या हावभावामुळं सारा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. या शिल्पाचं चित्र आपल्याला पूर्वी पाचशेच्या नोटवर पाहिल्याचं स्मरत असेल. हे शिल्प हे दिल्लीच्या मध्यवर्ती भागात, राष्ट्रपती संपदेच्या पश्चिम भागाला लागून आहे. मदर टेरेसा क्रिसेंट आणि सरदार पटेल मार्गच्या टी-जंक्शनला असलेले हे शिल्प या वाहत्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचे लक्ष वेधून घेत असते.  दांडी यात्रेच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी भारत सरकारनं ह्या ठिकाणी एक शिल्प उभं करण्याचं ठरवलं होतं. यासाठी सरकार एका प्रतिभावंत शिल्पकाराच्या शोधात होतं. आणि त्यावेळी अशा प्रकारच्या शिल्पाला न्याय देणारं देवीप्रसाद रॉय चौधरी यांच्याइतकं दुसरं कुणीही नव्हतं. पाटणामधलं हुतात्मा स्मारक आणि चेन्नईमधल्या बीचवरचं 'श्रमशक्तीचा विजय' या शिल्पांमध्ये चौधरी यांच्या प्रतिभेची झलक सर्वांना दिसली होती.

नव्वद वर्षांपूर्वी ह्याच दिवसांमध्ये (१ मार्च १९३० ते एप्रिल १९३०) दांडी यात्रा चालू होती. मिठावर इंग्रजांनी लादलेला कर म्हणजे सरळ सरळ अन्यायच होता. लोकांच्या मनात याविषयी चीड होती. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या अन्यायाला वाचा फोडणारे हे आंदोलन सुरु झाले. या यात्रेत सहभागी झालेल्या लोकांमध्ये एक प्रकारचा निश्चय होता, निर्भीडता होती. या आंदोलनात सर्व धर्माचे, सर्व जातींचे, समाजाच्या सर्व स्तरांमधले लोक होते. साऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची झपाटलेपणाची भावना होती. गांधीजींनी निवडक ८० लोकांसोबत या यात्रेला सुरुवात केली. त्यांना वाटेत अनेक अनुयायी मिळाले. ही मंडळी दरारोज १० मैल चालत प्रवास करायची. एकूण २४ दिवसांचा म्हणजे २४० मैलांचा हा प्रवास होता.

समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांनी निश्चयानं एकत्र येऊन बलाढ्य इंग्रज सरकारविरुद्ध लढा पुकारणं हा दांडी यात्रेचा आत्मा होता. देवीप्रसाद चौधरी यांनी दांडी यात्रेचा हाच आत्मा व्यक्त करण्याचा प्रयत्न या शिल्पामधून केला. या शिल्पात आपल्याला गांधीजींच्या मागे दहा लोक दिसतात. हे शिल्प 'ग्यारह मूर्ती' या नावानंच ओळखलं जातं.



शिल्पात सर्वात पुढं गांधीजी चालताना दिसतात. खाली नजर ठेवत चालणाऱ्या गांधीजींमध्ये निश्चय दिसतो. गांधीजींच्या मागं काही अंतरावर डोक्यावर पदर घेऊन चालणारी स्त्री दिसते. तिच्यामागं आपल्याला गांधीटोपी घातलेली एक व्यक्ती, कृश असणारा एक मुसलमान माणूस, डोक्याला पगडी असणारा एक शीख माणूस (याचा चेहरा आपल्याला सोबतच्या फोटोमध्ये दिसत नाही), आणि डोक्याला फेटा बांधलेला एक हिंदू पंडित दिसतो. त्यांच्या मागं ख्रिश्चन धर्मगुरूदेखील दिसतो. सर्वात मागं एक मुलगा वृद्धाला यात्रेत पुढं चालण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतोय. शिल्पातल्या दोन स्त्रीया सरोजिनी नायडू आणि मातंगीनी हाजरा मानल्या जातात. या साऱ्या लोकांमध्ये एकी जाणवते. विविधता असणारी ही सारी मंडळी एका ध्येयानं प्रेरित होऊन पुढं जाताना दिसतात.

चित्र असो वा शिल्प, आपल्या कलेत प्राण ओतणं ही चौधरींची खासियत होती. असं म्हणतात की सामान्य लोकांचं जीवन चौधरींना नेहमीच भावायचं. आपल्या कलाकृतीसाठी सारे मॉडेल्स ते नेहमी सामान्य जनतेतूनच निवडायचे. 'ग्यारह मूर्ती'मधले लोक कोण आहेत याविषयी अंदाज बांधण्याचे (विशेषतः इतिहासातल्या लोकांशी या व्यक्तिरेखा जोडण्याचे) कित्येक लोकांनी प्रयत्न केले आहेत. पण खरंतर शिल्पामधल्या साऱ्या व्यक्तिरेखा तुमच्या आमच्यामधले सामान्य लोक आहेत.

या शिल्पाचं काम पूर्ण होण्याआधीच देवीप्रसाद चौधरी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शिल्पाचं उरलेलं काम त्यांची पत्नी आणि त्यांचे विद्यार्थी यांनी पूर्ण केलं.

इतक्या असामान्य शिल्पाचा भाग लोकांनी चोरून न्यावा यापेक्षा विकृत आणि दुर्दैवी गोष्ट काय असावी? १९९९ मध्ये या शिल्पामधला गांधीजींचा चष्मा चोरीला गेला !! बागकाम करणाऱ्या एका व्यक्तीनं त्यावेळी पोलीस चौकीत तक्रारही नोंदवली. यानंतर - वेळा धातूचा चष्मा बसवण्याचा प्रयत्नही केला गेला. पण प्रत्येक वेळी - दिवसांमध्येच चष्मा चोरीला गेला.

चष्म्याशिवाय गांधीजींचा चेहरा थोडा चुकल्या चुकल्यासारखा वाटत असला तरी या शिल्पाचे असामान्यत्व कमी होत नाही. दिल्लीला गेल्यावर प्रत्येकानं हे शिल्प आवर्जून पाहायलाच हवं असं हे शिल्प आहे!!

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी

संदर्भ :
http://www.probashionline.com/deviprasad-roychowdhury/
Image Credit


No comments:

Post a Comment