Saturday, July 28, 2018

दी स्लेव्ह शिप

ओळख कलाकृतींची

दी स्लेव्ह शिप

अठराव्या शतकातलं शेवट शेवटचा काळ.. त्या काळात माणसांना गुलाम म्हणून विकता यायचं, विकत घेता यायचं.. गुलामीच्या प्रकाराला कायद्यानं अधिकृत मान्यता होती...

आफ्रिकेत पकडलेल्या माणसांना एका जहाजात भरण्यात आलं.. या जहाजात जवळपास ४४१ कृष्णवर्णीय लोक भरण्यात आले होते.. खरं तर जहाजात इतकी जागा नव्हतीच.. जहाज भरगच्च भरून गेलं होतं..
या माणसांना अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून विकण्यात येणार होतं.. जितकी जास्त माणसं तितका जास्त फायदा  असं ते साधं गणित होतं.. कोलिन्गवूड नावाचा माणूस या जहाजाचा कप्तान होता.. त्याला आता निवृत्तीचे वेध लागले होते.. त्यामुळे जास्तीत जास्त माणसांना नेऊन कंपनीकडून भरपूर पैसे कमवायचा त्याचा बेत होता..

अटलांटिक सागराच्या मध्यापर्यंत जहाज गेलं तेंव्हा बऱ्याचशा लोकांना कुपोषणामुळं वेगवेगळे आजार होऊ लागले होते.. बरेचशे लोक मरत होते.. कप्तानाला चिंता वाटू लागली.. लोक मरत होते याची त्याला मुळीच चिंता नव्हती - पण मेलेल्या लोकांना तिकडं नेऊन त्याला काहीच पैसे मिळणार नव्हते.. एकूणच व्यापारातल्या तोट्याची चिंता त्याला भेडसावत होती..

जहाजाच्या कंपनीनं या पकडलेल्या माणसांचा (खरंतर मालमत्तेचा) विमा उतरविलेला होता.. त्याकाळच्या नियमांप्रमाणं जहाजावरचे गुलाम लोक आजारी पडून मेले तर तो नैसर्गिक मृत्यू असल्यानं विमा कंपनीकडून काहीच पैसे मिळणार नव्हते.. पण काहीतरी योग्य कारणासाठी जर त्यांना मारावं लागलं असतं तर मात्र विमा कंपनीकडून पैसे मिळणार होते !!

कप्तानानं 'आर्थिकदृष्ट्या योग्य' असा निर्णय घेतला.. त्यानं आजारी असणाऱ्या महिला आणि मुलं यांना समुद्रात फेकून दिलं.. त्यानं अजून काही लोकांना दुसऱ्या दिवशी समुद्रात फेकून दिलं.. त्यानं एकूण १३३ लोकांना समुद्रात फेकून दिलं..

जहाज शेवटी २२ डिसेंबर १७८१ ला जमैकाला पोहोचलं.. ज्या प्रवासाला ६० दिवस लागत त्या प्रवासाला १०८ दिवस लागले होते.. अजूनही २०८ लोक जिवंत होते.. त्यांना विकण्यात आलं.. जहाजाचा कप्तानही जहाज जमैकाला पोहोचल्यावर ३ दिवसांत वारला..

जहाजाची कंपनी लिव्हरपूल (इंग्लंड) इथली होती.. जहाज लिव्हरपूलला परत आल्यावर जहाजाच्या मालकानं विमा कंपनीकडं विम्याच्या रक्कमेचा दावा केला.. त्याच्या मते जहाजावर पुरेसं पाणी नव्हतं आणि काही लोकांचे प्राण (खरंतर मालमत्ता) वाचविण्यासाठी काही लोकांना समुद्रात फेकणं गरजेचं होतं.. विमा कंपनीच्या मते जहाज जमैकाला पोहोचलं तेंव्हा जहाजामध्ये पुरेसं पाणी असल्याचं रेकॉर्ड होतं..

पण १३३ जिवंत माणसांना क्रूरपणे समुद्रात फेकून देणं हे मात्र कुणालाच चुकीचं वाटत नव्हतं !!
ही केस कोर्टात गेली.. कोर्टानं विमा कंपनीला विम्याची रक्कम  जहाज कंपनीला देण्याचे आदेश दिले.. पुढे विम्याची कंपनी वरच्या न्यायालयात गेली..

पुढं बऱ्याच वर्षांनी, १८३३ मध्ये ब्रिटिश साम्राज्यातून गुलामीचा व्यापार बेकायदेशीर ठरवण्यात आला..
पण चित्रकार टर्नर आणि गुलामीच्या विरोधात असणारी एक संघटना (Anti Slavery Society) यांना गुलामी हा प्रकार जगातच नको होता..

टर्नरनं या जहाजावर झालेल्या प्रकाराचं चित्र काढलं.. त्यानं १८४० मध्ये काढलेल्या या चित्रात अशांत समुद्र दिसतो.. एखादं वादळ येतंय असं वाटतं.. सूर्यास्ताचा आणि समुद्राच्या पाण्याचा रंग लाल आहे..  टर्नरनं चित्रातल्या रंगांवर खूप भर दिला.. नीट जवळून बघितलं तर आपल्याला दिसतं की जहाज पुढं गेलंय.. जहाजामधून लोकांना फेकण्यात आलंय आणि समुद्रात पडलेल्या माणसांना भक्षक माशांनी घेरलंय.. आपल्याला गुलामांना बांधण्यासाठी वापरलेल्या साखळ्याही समुद्रात दिसतात..  

- दुष्यंत पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


संदर्भ:

J.M.W. Turner (by Wyllie, W. L. (William Lionel)) - प्रकाशनवर्ष 1905

FAMOUS PAINTINGS (various authors) - प्रकाशनवर्ष 1902

विकीपेडीया

 

No comments:

Post a Comment